
जळगाव मिरर | ११ मे २०२६
ठिबकच्या कंपनीत काम करतांना शनिवारी रात्रीच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने दीपक छगन भिल (वय ३५, मूळ रा. खर्डी, ता. चोपडा, ह.मु. एमआयडीसी एस सेक्टर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील कंपनीत घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील खर्डी येथील दीपक भिल हा तरुण एमआयडीसी परिसरातील एस सेक्टरमधील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीत कामाला होता. कंपनीच्या परिसरात तो पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीतील दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने दीपक हा गंभीर जमखी झाला होता. यावेळी कंपनीत काम करणाऱ्यांनी दीपकला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी दीपकवर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दीपकच्या पत्नीने घटनेची माहिती तिच्या सासरच्यांना दिल्यानंतर ते रविवारी सकाळच्या सुमारास जळगावात दाखल झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
पोलिसांनी आमच्या परवानगीशिवाय आणि माहिती न देता पोस्टमार्टम केल्याचा गंभीर आरोप दीपकच्या कुटुंबीयांनी केला आहे. पंचनामा आणि पोस्टमार्टम प्रक्रियेदरम्यान आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आली नाही, असा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले होते. परंतू याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
दीपकचा मृत्यू अपघाती नसून संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबीयांनी यावेळी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेच्या एक ते दीड तासापुर्वी दीपक याने वडीलांना कॉल करुन आपल्याला कंपनीत त्रास दिला जात असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर काह वेळातच दीपकचा मृत्यू झाला. जो पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमीका नातेवाईकांसह ग्रामस्थ आणि लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी एकता परिषदेने घेतली होती.





















