
जळगाव मिरर | ३ जून २०२६

भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनी परिसरात २९ मे रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगेश अंबादास काळे (वय २६, रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात आता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास मंगेश काळे हे पत्नी पायल यांच्यासह घरी असताना कुंदन पठाडे, रोहित नवगिरे ऊर्फ दादू, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट, अंकित आणि भावेश हे तेथे आले. जुन्या वादातून आरोपींनी मंगेश यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
यावेळी कुंदन पठाडे याने लोखंडी रॉडने, रोहित नवगिरे याने लाकडी दांड्याने तर विशाल गेंगाट याने हॉकी स्टिकने मारहाण केली. पत्नी पायल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. जीव वाचविण्यासाठी मंगेश यांनी घराच्या छतावरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा रॉड, लाठ्या आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमा होऊ लागल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतील मंगेश यांना मित्रांच्या मदतीने भुसावळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने ३१ मे रोजी त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना १ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, मृतदेह मुंबईहून भुसावळ येथे आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रारंभी या प्रकरणात जीवघेणा हल्ला आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांनी २ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यास भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पोलिस पथके कार्यरत करण्यात आली असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबीयांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.




















