मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार कार्यरत आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात परतल्यानंतर केलेल्या वक्तव्यांमुळं शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा जाहीर केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याच्या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात यात्रा
एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या एकूण ४० आमदारांनी बंड केलं. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल सरकार कोसळण्यापूर्वी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांना बळ देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दाखल झाल्यानंतर केलेल्या वक्तव्यांनतर निर्माण झालेला शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून केला जाईल.
निष्ठा यात्रेचं स्वरुप कसं असेल
आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. शिवसेनेच्या २३६ शाखांना आदित्य ठाकरे यानिमित्तानं भेटी देणार आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील ही यात्रा जाणार आहे. सेनेच्या २३६ शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांची आदित्य ठाकरे भेट यानिमित्तानं घेतील. सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न देखील यानिमित्तानं करण्यात येईल. आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन देखील करतील.आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना गद्दार हे गद्दार असतात. ज्यांना यायचं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना भवन आणि मातोश्री येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरु ठेवला आहे.




















