जळगाव मिरर | २१ मे २०२३
देशातील जनतेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये अशा नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी आपल्या सर्व शाखांना सूचित केले की 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म आणि कोणत्याही ओळखीचा पुरावा आवश्यक नाही. बँकेने 20 मे रोजीच्या परिपत्रकात म्हटले आहे की, “एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत रु. 2,000 च्या एक्सचेंजची सुविधा कोणत्याही फॉर्म शिवाय दिली जाईल.”
सन २०१६ च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे. चलनात इतर नोटा (दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत) पुरेशा संख्येने आल्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई देखील २०१८ नंतर थांबवली होती. यातील बऱ्याचश्या नोटा २०१७ पूर्वी छापल्याने त्यांचे आयुष्यही संपत आले होते. तसेच या नोटा चलनात फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात नव्हत्या, असेही ध्यानात आले होते. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात ही रिझर्व बँकेची क्लीन नोट पॉलिसी आहे.