
जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांनी आज रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, टाटांना महाराष्ट्र शासनाचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव केला.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे. यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान, ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या दानशूरपणाबद्दल ओळखल्या जातात.





















