जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२३
गेल्या ८ महिन्यात राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग, अत्याचार तसेच अश्लील वर्तनाच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत ८ महिन्यात महिला अत्याचारासंबधित तब्बल १२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार केला. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला मालवणीला सोडून दिले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे. सलमान शेख आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टॅक्सी चालकावर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईनंतर दुसरा क्रमांक पुणे शहराचा आहे. पुण्यात गेल्या ८ महिन्यांत विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. यामध्ये १२४ घटना बलात्काराच्या असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेत तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून गेल्या ८ महिन्यांत नागपुरात ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे.




















