
जळगाव मिरर | ३० जून २०२४
राज्यात सर्वच पक्षांनी आतापासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून प्रत्येक पक्षात बैठकीचे सत्र सुरु झाले आहे. त्यात मनसेने देखील यंदाच्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जोर दिला असून यासाठी राज्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांची बैठकी होवू लागल्या आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसे मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे चिन्ह दिसू लागले असतांना जळगाव जिल्ह्यात मात्र ११ पैकी ६ जांगावर मनसे उमेदवार देणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांशी संपर्क केला असता काही जिल्हाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली तर काहींनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मनसेत सध्या काय सुरु आहे. यावर मात्र संभ्रम निर्माण होत आहे.
मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईत घेतली होती. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना देण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि मनसेचे इच्छुक उमेदवार याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल.
सर्वच जागेवर तयारी ; अनिल वाघ ( जिल्हाध्यक्ष, चाळीसगाव – भडगाव)
मुंबईत झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक जागेवर तयारी करण्याचे आदेश मनसे पक्षाच्या वरिष्ठ यांनी दिले असून त्यासाठी आम्ही प्रत्येक मतदार संघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना व दौरे करून पक्षाचे संघटन वाढवत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी बोलतांना सांगितले आहे.
११ जागेसाठी आमची मागणी ; मुकुंदा रोटे (जिल्हाध्यक्ष, जळगाव ग्रामीण)
सन २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यावर आम्ही चांगली लढत दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केले आहे, मुंबई झालेल्या बैठकीत प्रत्येक मतदार संघात मनसेचे काम करून यंदाची निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करू व पक्षाने आदेश दिल्यास प्रत्येक मतदार संघात निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी सांगितले आहे.





















