जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आज पहाटेच्या सुमारास नाशिक-गुजरात हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात हा अपघात झाला. एका खाजगी लक्झरी प्रवासी बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले, तर 15 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण की, बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले. अपघातस्थळी आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन आटोपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत.
इतका भीषण अपघात नेमका कशामुळे झाला? ते अजून समजू शकलेलं नाही. बस चालकाच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची एक प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक भागात खासकरुन घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात धुकं असतं. त्यामुळे सुद्धा हा अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच हरियाणामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला होता. पंजाबमध्ये लग्न सोहळा आटोपून गावकरी घरी परतत असताना क्रूझर गाडी कालव्यात कोसळली. हा सुद्धा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर 10 बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु होता.