
जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२५
देशाचा भूगोल, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, यापैकी काहीही माहीत नसताना बेजबाबदार बरळून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना न्यायालयाने कानपिचक्या दिल्याने आता त्यांनी जिभेला लगाम घालावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान केल्याबद्दल देशाची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी भाजपच्या जिल्हा महानगर अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांनी केली आहे.
ज्या देशभक्तांच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यांचा अपमान करताना त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून जीभ आवरा, अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही अपमानास्पद वक्तव्याची स्वतःहून गंभीर दखल घेऊन कारवाई करावी लागेल, असेही न्यायालयाने राहुल गांधी यांना बजावले आहे. काही शिष्टाचार पाळण्याची प्रथा म्हणून महात्मा गांधीदेखील इंग्रज व्हाईसरॉयना पाठवलेल्या पत्रात “तुमचा प्रामाणिक सेवक/नोकर” असे लिहीत असत. त्यामुळे अशा इतिहासाची माहिती नसलेल्यांनी काहीही बोलून स्वातंत्र्यसेनानींच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नये, अशा शब्दांत न्यायालयाने राहुल गांधींची कानउघाडणी केली आहे. आता आपले इतिहासाचे व स्वातंत्र्यलढ्याविषयीचे अज्ञान उघड झाल्यावर तरी राहुल गांधींनी बेतालपणा बंद करून न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा व भविष्यातील संभाव्य कायदेशीर कारवाईपासून स्वतःला वाचवावे, असा खोचक सल्लाही उज्वलाताई बेंडाळे यांनी दिला.
राहुल गांधींच्या सावरकर द्वेषास खतपाणी घालून जनतेचा रोष ओढवून घेणाऱ्या कॉंग्रेसच्या द्वेषाच्या राजकारणास न्यायालयाने चपराक लगावली असून केवळ लाचारीपोटी राहुल गांधींच्या बेताल वक्तव्यासमोर गुडघे टेकणाऱ्या तथाकथित कडव्यांनीही या आदेशातून बोध घ्यावा, असेही उबाठा सेनेचा थेट उल्लेख टाळून जिल्हा अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे म्हणाले.




















