
जळगाव मिरर | १३ मे २०२५
अचानक थांबलेल्या रिक्षामुळे त्याच्या मागे येत असलेले वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात रिक्षातील प्रवासी महिला खैरुननाज इरफान भिस्ती (वय २४, रा. भिस्ती मोहल्ला, शाहूनगर) या जखमी झाल्या. ही घटना दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हॉटेल टुरिस्ट समोर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निमखेडी शिवारातील हिराशिवा कॉलनीत शिवाजी युवराज पाटील हे अभियंता वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे (एमएच ०५, डीई ००६८) क्रमांकाची कार आहे. दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नेहरु चौकातून घरी जात होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे होते, त्यामुळे एक प्रवासी रिक्षा अचानक थांबल्यामुळे कारचालक देखील थांबले. त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणारी (एमएच १९, डीव्ही ६८८६) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी पाटील यांची कार समोर असलेल्या रिक्षावर जावून आदळली. या अपघातात रिक्षातील खैरुननाज भिस्ती ही महिला गंभीर जखमी झाली. त्यांना तात्काळ उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, शिवाजी पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ललित बागुल करीत आहे.




















