
जळगाव मिरर | २५ जून २०२६

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मंजूर झालेल्या अनुदानाचे बिल काढून देण्यासाठी ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई चाळीसगाव शहरात करण्यात आली असून, या घटनेमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यशपाल विठ्ठल महाजन (वय ५३), वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, चाळीसगाव (जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार यांनी चाळीसगाव तालुक्यातील आपल्या शेतात चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर वृक्ष लागवड व संवर्धनासाठी तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी देय असलेले ५० हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी संबंधित वनपालाने बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ७ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राने सापळा रचला. पंचांसमक्ष झालेल्या कारवाईदरम्यान संशयिताने २४ जून २०२६ रोजी ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.





















