
जळगाव मिरर | २३ मे २०२५
कुटुंबिय गाढ झोपेत असतांना ईश्वर सुखदेव वाघ (वय ४९, रा. समता नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना गुरुवार सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रौढाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील समता नगरात ईश्वर सुखदेव वाघ हे पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. हातमजुरी करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवार दि. २१ मे रोजी रात्री ११ वाजता त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले आणि ते झोपण्यासाठी मागच्या खोलीत निघून गेले. कुटुंबिय रात्री गाढ झोपेत असतांना ईश्वर वाघ यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ईश्वर वाघ यांचा मृतदेह बघताच त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल केला. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















