
जळगाव मिरर | ४ जून २०२५
राज्यातील भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन व ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या गेल्या दोन दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक आरोप केला. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर आहे. तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत, असे त्यांनी म्हटेल आहे. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे महायुती सरकारमध्ये एकच खळबळ माजली असून, अभिषेक कौल कोण? असा सवाल केला जात आहे.
संजय राऊत बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. मी म्हणजेच पक्ष असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो, तेव्हा त्या माणसाच्या अधःपतनाला सुरूवात होते. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाराज होते. ते आज जिथे आहेत तिथेही फार खूश नाहीत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भाजप व शिंदे गटाच्या लोकांचा पक्ष फोडणे हा एकमेव अजेंडा आहे. हे लोक आपापल्या मंत्रालयातील काम करत आहेत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. त्यांना मोठ्या मिन्नतवाऱ्या करून यावेळी मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यांना मंत्री करण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण, यांच्या भ्रष्टाचार व इतर प्रकरणाच्या गोष्टी तिथपर्यंत गेल्या होत्या.

गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार, बिल्डर आहे. तो गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सर्व व्यवहार करतो. त्याच्याकडे पैसे जमा करावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्वसामान्य माणसांच्या संबंधित खाते आहे. 350 फाईल महाजन यांच्या मंत्रालयात पडून आहेत. या सर्व फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. हे सर्व व्यवहार कौल करत आहे. महाजन यांनी त्यासाठीच त्याची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे याची माहिती मागावी. त्यांना ती मी देईल. पण ते यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत हे मला माहिती आहे. पण या राज्याला कळले पाहिजे की, या राज्याला काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याभोवती जे साधूसंतांचे महामंडळ गोळा गेले आहे, त्यातील एक साधूसंत हे गिरीश महाजन आहेत. त्यांची लायकी ही आहे, असे ते म्हणाले.




















