
जळगाव मिरर | २४ जून २०२५
महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. आज पहाटेपासून पुणे, रायगड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२४ ते २८ जून २०२५ पर्यंत असे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीदरम्यान एकूण १९ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये, तसेच सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. धरण साखळी क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली. पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. आजही पहाटेपासून पुण्यात पाऊस सुरू आहे.





















