जळगाव मिरर | २८ जून २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले असून आता या प्रकरणी सरकार व विरोधकांत कमालीची राजकीय चिखलफेक होत असताना आता भाजपच्याच एका मंत्र्याने महायुती सरकारला घरचा आहेर दिल्याची बाब समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्यावर मराठीचे संस्कार झाल्यामुळे आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार असे ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आदिवासी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अशोक उईके यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यात त्यांनी हिंदीच्या मुद्यावर आपले विचार अत्यंत स्पष्टपणे मांडले. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला. माझी आई निरक्षर होती. तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले. त्यामुळे मला तीच भाषा येते. मला हिंदी येत नाही. त्यामुळे मी हिंदी माध्यमांशी हिंदीत बोलणार नाही, असे ते म्हणाले. अशोक उईके यांनी या विधानाच्या माध्यमातून एका अर्थाने सध्याच्या वादात मराठीचाच पुरस्कार केला. त्यामुळे त्यांच्या या विधानाने विरोधकांच्या टीकेला आणखीणच धार येण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी गुरूवारी प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत सरकारविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनाक्रमामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना अशोक उईके यांनी उपरोक्त विधान करून एकप्रकारे आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
