
जळगाव मिरर | १० जुलै २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी-मराठी भाषेचा वाद सुरु झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी मनसे आता आक्रमक झाले असून आता महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे मोबाइल मेसेज मराठीत पाठविण्याबाबत जामनेर महावितरण विभाग यांना मनसे द्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे
आज दि.९ रोजी जामनेर मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्यावतीने महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी जसे की वीजबिल भरण्याची तारीख, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी, देखभाल-दुरुस्तीमुळे होणारी वीज खंडित सेवा इ. – मोबाईलवर एसएमएस पाठविले जावेत यासाठी निवेदन देण्यात आले आहे . हे सर्व मेसेज इंग्रजी भाषेत असतात.
महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असून, त्यांना इंग्रजी भाषेतील संदेश समजणे कठीण जाते. परिणामी अनेक वेळा ग्राहकांना योग्य वेळी महत्त्वाची माहिती मिळत नाही, त्यामुळे गैरसमज, त्रास व मानसिक तणाव निर्माण होतो.
महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट आदेश आहे की, शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी असावी. महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा संवर्धन व वापर वाढीसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आहेत. त्यानुसार महावितरणसारख्या सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या खात्याने आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे.
अतः आमची मागणी आहे की, महावितरण विभागामार्फत ग्राहकांना मोबाईलवर पाठविले जाणारे सर्व प्रकारचे मेसेज (बिल भरण्याची तारीख, वीज कापणीची सूचना, सेवा खंडित इ.) मराठी भाषेत पाठवले जावेत. ह्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संदेश समजणे सोपे जाईल व विभागावरचा विश्वास अधिक दृढ होईल.
ही मागणी अतिशय महत्वाची असून, आपण यास सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर कार्यवाही करा अशी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी निवेदनातून मनसे दणका दिला आहे.यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील व सागर जोशी , मनविसे तालुका अध्यक्ष किशोर पाटील , आदी उपस्थित होते




















