
जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असतांना आता सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रपातींना ते भेटायला बोलावत नाहीत, ही बातमी आहे. या देशात सध्याच्या कामाच्या पद्धती पाहता काहीही होऊ शकते. काय होते ते पाहू, असे संजय राऊत म्हणाले.
महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही संपून जातील, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्त्व देत आहात. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात एक माणूस बोलतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकप्रकारे त्यांचे एकप्रकारे समर्थन करत आहेत. या प्रवृत्तीला दिल्लीतील लोकांनी खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे. ते हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नाहीत.
तुम्ही घाम गाळायला आलात, म्हणजे पैसे कमवायला, मुंबई ओरबाडायला आला आहात. तुमच्या राज्यात नोकऱ्या, उद्योगधंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आला आहात. इकडचा पैसे तुम्ही तुमच्या राज्यातच घेऊन जात आहात, हे दुबेला कळायला पाहिजे. मराठी माणसाचे पोट मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात. भव्य मुंबई निर्माण करण्यासाठी इथे आले नाहीत, असा घणाघात संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांच्यावर केला आहे.
नितीन गडकरी किंवा अन्य कुणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचे नाव घेऊन देशातील जडणघडतील योगदानाविषयी काही बोलले असतील, तर त्यात चुकीचे काय? भाजप आणि सरकारमध्ये सध्या नितीन गडकरी समजदार मंत्री आहेत. नेहरूंचे नाव घेतल्यामुळे नितीन गडकरींवर कारवाई तर होणार नाही ना? अशी शंका मला येते. मुंबईमध्ये एका मेट्रो रेल्वे स्टेशन नाव देताना नेहरू नाव काढले आणि विज्ञान केंद्र नाव दिले आहे. मुळात ते नेहरू विज्ञान केंद्र आहे. एवढा द्वेष कुणाच्या पोटात असेल, तर ते या देशावर राज्य करायला लायक नाहीत.





















