जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५
गेल्या ९ दिवसापासून जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम याठिकाणी अकाल भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरु असून या दरम्यान, काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे, तर इतर दोन सैनिक जखमी झाले. रात्रभर हा परिसर मोठ्या स्फोटांनी आणि गोळीबाराने दणाणून गेला होता.
आतापर्यंत, चकमकीत एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे, तर एकूण दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि दहा सैनिक जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, घनदाट जंगले आणि नैसर्गिक गुहासारख्या लपण्याच्या ठिकाणांचा फायदा घेत किमान तीन किंवा त्याहून अधिक दहशतवादी अजूनही लपून बसले आहेत. ही चकमक गेल्या काही दशकांमधील सर्वात जास्त काळ चालणारी दहशतवादविरोधी कारवाई ठरली आहे.
दरम्यान, कुलगाममध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या घेराव आणि सततच्या सुरक्षा कारवाईत अडकलेल्या स्थानिकांनी प्रचंड अडचणींचा हवाला देत अखल गावातून त्यांचे विस्थापन करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. रहिवाशांचा असा दावा आहे की कारवाईदरम्यान सतत होणाऱ्या गोळीबार आणि स्फोटांमुळे त्यांना झोप येत नाही. आता त्यांच्याकडे अन्नही संपत आल्याचे सांगण्यात येत आहे.
