
जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२५
आज राज्यातील अनेक ठिकाणी दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असून राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेला लुटणाऱ्यांची हंडी फोडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. निवडणुकीनंतर विजयाची हंडी फोडणार असल्याचा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
भाजप आमदार राम कदम यांच्या वतीने घाटकोपरमध्ये आयोजित दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या नंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दहीहंडी महोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर विजयाची हंडी तर आम्ही फोडणारच आहोत. मात्र ज्यांनी महानगरपालिका लुटली, त्यांच्या पापाची हंडी देखील आम्ही फोडणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही जी हंडी लावू त्यातले लोणी हे सर्व सामान्यांना मिळेल, ते कोणाच्या घरात जाणार नाही, हा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली होती. आता मुंबईमध्ये राम कदम यांच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरची आठवण म्हणून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयी फडणवीस म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या पापाच्या हंडी भारतीय सैनिकांनी फोडली होती. त्या सैनिकांना या ठिकाणी सलाम केला जात आहे. याबद्दल राम कदम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या सैनिकांना समर्पित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनी पाकिस्तानची पापांची हंडी फोडली आणि आता येथे, त्याच सैनिकांचा सन्मान केला जात आहे. कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. हा सण महाराष्ट्रातील मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कितीही पाऊस पडला तरी येथील आपल्या गोविंदांचा उत्साह कमी होऊ शकत नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल पुढे ते म्हणाले की, “पापांची हंडी आधीच फुटली असल्याने बदल घडणारच आहे. आता एक नवीन हंडी रचली जाणार आहे आणि आम्ही समाजातील सर्व घटकांना त्याचे लोणी वाटण्यासाठी काम करू.




















