
जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२५
जळगाव एमआयडीसी परिसरातील अनेक खाजगी कंपन्यांकडून कामगारांच्या पगारातून दरमहा नियमितपणे भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात केली जात असली तरी, संबंधित रक्कम पीएफ कार्यालयात जमा केली जात नसल्याच्या गंभीर तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत.
मनसेच्या वतीने यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईसाठी पत्र देण्यात आले आहे. मनसेने स्पष्टपणे सांगितले आहे की, कामगारांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हक्क डावलला जाणार नाही आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
मनसेच्या पत्रात खालील तीन मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
- तपासणी करून कठोर कारवाई करावी – जे कंपनीने कामगारांची PF रक्कम कपात करूनही जमा केली नाही, अशा सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी.
- PF रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश द्यावेत – संबंधित कंपन्यांना कामगारांची थकित रक्कम तत्काळ भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात यावेत.
- भविष्यातील उल्लंघन रोखण्यासाठी उपाययोजना – यापुढे कोणतीही कंपनी कामगारांची PF रक्कम थकवणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
या संदर्भात मनसेने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि संबंधित कार्यालयाच्या निष्क्रियतेविरोधात संघर्ष करेल. “कामगारांच्या हक्कासाठी लढणे ही मनसेची बांधिलकी आहे,” असे मनसेने ठामपणे सांगितले आहे.
याप्रसंगी मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, दीपक राठोड, साजन पाटील, जितेंद्र पाटील, भूषण ठाकरे, विकास ऐश्वर्या, श्रीराम विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




















