
जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “एखादा नेता मला भेटला म्हणून राजकारण ठरत नाही,” असे स्पष्ट करत फडणवीस यांनी राज ठाकरे हे महायुतीसोबत येणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणेच लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. जवळपास पाऊण तास झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात महायुतीसोबत मनसेची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र महायुती अभेद्य आहे आणि आम्ही निवडणुका एकत्रच लढणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याने त्या चर्चाही संपुष्टात आल्या आहेत. लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही. आम्हाला कोण येऊन भेटतो यावरुन युती ठरत नाही किंवा त्यावरुन राजकारणही होत नसते. आगामी स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार आणि या निवडणुका महायुतीच जिंकणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
कत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेची मते चोरली गेल्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘गालिब’चा एक शेर वाचून त्यांची खिल्ली उडवली. “दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…” असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचा हा दावा फेटाळून लावला.
फडणवीस म्हणाले, “2014 मध्ये नरेंद्र मोदींनी विजय मिळवला तेव्हा काँग्रेसकडे देशात आणि राज्यात 15 वर्षांची सत्ता होती. जनतेने नाकारले त्याचा अभ्यास न करता विरोधक छाती ठोकून बोलतात. जोवर सत्याचा स्वीकार होणार नाही, तोवर त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. लोकांचा अपमान करून कोणी निवडून येत नाही.”




















