
जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरू शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजेंद्र साबळे यांनी 25 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं, अशी विनंती करण्यासाठी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते.
या भेटीनंतर जरांगे यांनी मोर्च्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. अशामध्ये मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगेंना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. याबाबत हायकोर्टाने सांगितले की, मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे हे अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करू शकत नाहीत. यासाठी कोर्टाने त्यांना गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा दाखला दिला.
यावेळी मुंबई हायकोर्टाकडून जरांगे यांच्या आंदोलनासाठी पर्यायी मार्ग निवडण्याचा देखील सुचवले आहे. याबाबत मुंबई हायकोर्टाने पुढे सांगितले की, ‘मुंबईत सार्वजनिक जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून मनोज जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर येथे शांततापूर्ण निषेधासाठी पर्यायी जागा द्यायची की नाही हे सरकार ठरवू शकते. सार्वजनिक सभा आणि आंदोलनासाठी नवीन नियमांनुसार परवानगी मिळाल्यानंतर शांततापूर्ण निषेध करता येतात. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.




















