
जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५
राज्यात झालेल्या पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे मोठे नुकसान झाले असून आज उद्धव ठाकरे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथे पाहणीवेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या सरकारला तुमच्या अन्याय करू देणार नाही, हे सांगायला मी येथे आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य वेळ कधी येणार? त्यासाठी आता पंचांग पाहणार आहात का? असा उपरोधिक सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.
गेल्या चार दिवसांपासून मराठावाड्यातील धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा.कार माजवला असून, शेतकऱ्यांचा संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी तर जमिनीवरील मातीही खरडवून निघाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
सरकारने पीकविम्याचे निकष बदलले आहेत. पीकमिव्याची पूर्ण रक्कम आताच मिळाली पाहिजे. पीकविम्याची रक्कम आताच मिळत नसेल तर विम्याचे थोतांड कशाला हवे, असे म्हणत पीकविम्याची रक्कम सरकारने तत्काळ द्यावी, अशीही मागणी ठाकरेंनी केली. आज माझ्या हतात काहीही नाही. मी फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. मी सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की वेडेवाकडे पाऊल उचलू नका. वाईट दिवस जातील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून नये असे आवाहन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यात कित्येक वर्षांनंतर असे संकट कोसळले असेल. आपत्ती मोठी आहेच, पण अशा संकटावेळी सरकार खंबीर असायला पाहिजे. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही. पण या सरकारला शेतकऱ्यांवर अन्याय करू देणार नाही, हे सांगायला आलेलो आहे.
आजच्या या संकटात केवळ शेतकऱ्यांची शेती वाहून गेली नाही, तर त्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? कशी घोषणा केली? यावर मी नंतर बोलेन. पण तूर्त सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, योग्य वेळी अमुक करू, तमुक करू असे सरकार दरवेळी सांगते. पण तुमची योग्य वेळ येणार कधी? का त्याच्यासाठी तुम्ही पंचांग पाहणार आहात का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्याला कर्जमुक्त करा, अशी पहिली मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली. सरकाराने काय मदत केली हा वेगळा भाग आहे. पण आम्हाला हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अशी दुसरी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
या पुरात शेतीचे फक्त नुकसानच झालेले नाही. जमीनच खरडून गेली आहे. ही जमीन पुन्हा नीट करायला तीन ते पाच हजार वर्षे लागणार आहेत. आज सरकारने अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. शेत साफ करण्याचा खर्च, कर्जाचा खर्च फार आहे. जमिनीची वाताहत झाली आहे, ती नीट करण्याचा खर्च आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.




















