जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५
राज्यात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी “वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा आहे” असे उघड विधान केल्यानंतर मनसे आणि शिंदे गटाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यामुळे या मुद्यावरून सत्तारूढ आघाडीमध्ये नवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरात हा मुद्दा ऐरणीवर आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या मागासलेपणाचा उल्लेख करत स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा उपस्थित केली. त्यावर बोलताना मंत्री बावनकुळे यांनी थेट विधान केले की, “वेगळा विदर्भ हा भाजपचा प्राधान्याचा मुद्दा आहे. हा अजेंडा आमच्या पक्षातून कधीच बाहेर गेलेला नाही. आम्ही पहिल्यापासून विदर्भाच्या राज्यत्वाच्या बाजूने आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शवले आहे.”
त्यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, “काँग्रेसकडे जनतेसमोर ठेवण्यासाठी मुद्दे उरलेले नाहीत, म्हणून घाबरून हा विषय काढत आहे. पण हा मुद्दा नेहमीच भाजपाचा होता आणि राहणार आहे.”
बावनकुळे यांच्या वक्तव्यावर मनसे तुफान भडकली. मनसेने सोशल मीडियावरून तीव्र निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्राचे तुकडे करण्याची इच्छा सत्ताधाऱ्यांची दिसते. मराठी म्हणून एकत्र राहू शकणाऱ्या महाराष्ट्राची शकलं का पाडायची आहेत? हे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. राजसाहेबांनी यावर कायमच कडक भूमिका घेतली आहे.” मनसेने यासोबत राज ठाकरे यांचा याच विषयावरील एक जुना भाषणाचा व्हिडिओही पोस्ट केला.
सत्ताधारी शिवसेनेनेही स्वतंत्र विदर्भाला स्पष्ट विरोध दर्शवला. “अशा मागणीला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही,” अशी भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली. त्यामुळे भाजपचा अधिकृत भूमिका–मंत्री स्तरावरील वक्तव्य–आणि सहयोगी पक्षांची नाराजी यामुळे सरकारसमोर नवा राजकीय प्रश्न निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गेल्या काही वर्षांत वेळोवेळी पुढे आला असला तरी सत्ताधाऱ्यांनी असे स्पष्ट विधान क्वचितच केले होते. बावनकुळे यांच्या विधानामुळे हा विषय पुन्हा मध्यवर्ती ठरला असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये तो निर्णायक ठरू शकतो.





















