आई वडिलांचे जबाब व डॉक्टरांच्या अहवालात तफावत : महिनाभराने वडिलांविरोधात गुन्हा : आरोपी अटकेत
जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२५
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथुन जवळच असलेल्या मोराड ता. जामनेर येथील कृष्णा लालचंद राठोड वय २६ यास आधी तीन मुली आहेत व आता मुलगा होईल अशी खात्री असतांना चौथी सुद्धा मुलगीच झाल्याचा राग आल्याने आरोपी जन्मदात्या वडीलांनी कृष्णा लालचंद राठोड या अवघ्या ३ दिवसांच्या आपल्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारुन यमसदनी पाठवली. मात्र याप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली होती. याबाबत शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस उप निरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांनी चौकशी केली.
या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शेंबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत २५ डिसेंबरच्या रात्रीच नऊ वाजता आरोपी पिता कृष्णा राठोड याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत.
मुलीच्या आईवडिलांनी मुलगी आईच्या हातातून पडून ती मरण पावल्याचे पोलिसांना सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकानी दिलेले जबाब व डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातील तफावत यामुळे पोलिसांना स्वशय आल्याने पोलिसांनी मुलीच्या वडिलांची कसून चौकशी केली असता चौकशीत अखेर आपल्याच ३ दिवसांच्या मुलीच्या मृत्युस जन्मदाताच कारणीभुत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी कृष्णा लालचंद राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३४९ भा. न्या. सं. कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन उप विभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शना खाली पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.
बुरसटलेल्या मानसिकतेची ठरली बळी
मुलगा-मुलगी समान असल्याची जाणीव वाढत असल्याचा दावा केला जात असतानाच, केवळ मुलगाच हवा या हट्टापायी एका पित्याने आपल्या पोटच्या लेकीचा जीव घेतल्याची घटना परिसरात तीव्र हळहळ निर्माण करणारी ठरली आहे. मुलीच्या जन्माचा राग तब्बल दीड महिना मनात साठवून ठेवून केलेल्या या अमानुष कृत्यामुळे समाजातील मुलग्याच्या हव्यासाची आणि स्त्रीविषयीच्या विकृत मानसिकतेची भीषण वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे. केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सारख्या उपक्रमांतून व्यापक जनजागृती करण्यात येत असली, तरी समाजातील बुरसटलेली मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाही, हेच या संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतून स्पष्ट होते. मुलगा हवा असताना चौथीही मुलगीच झाली, या रागातून एका निर्दयी बापाने केलेलं कृत्य अक्षम्य असल्याची भावना जिल्हाभरात व्यक्त केली जात आहे.





















