जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
जळगाव शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. अशाच प्रचारादरम्यान शहरातील एक प्रसिद्ध उमेदवार तथा माजी नगरसेवक आपल्या प्रभागात मतदारांच्या भेटीसाठी गेले असता, एका परिसरातील नागरिकांनी त्यांना विविध नागरी समस्यांचा पाढा वाचत चांगलेच हैराण केले.
रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, सांडपाणी व्यवस्था, कचरा संकलन व पथदिव्यांचे प्रश्न नागरिकांनी थेट माजी नगरसेवकांसमोर मांडले. केवळ समस्या दाखवून न थांबता, “नगरसेवकांचे कर्तव्य नेमके काय असते आणि निवडून आल्यानंतर जबाबदाऱ्या कशा पार पाडायला हव्यात,” याचीही आठवण नागरिकांनी करून दिली.
या भेटीत मत मागण्याऐवजी माजी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. नागरिकांनी यावेळी, निवडणुकीच्या काळातच नव्हे तर पाचही वर्षे लोकांमध्ये राहून काम करण्याची गरज असल्याचे ठणकावून सांगितले.
या घटनेमुळे प्रचारादरम्यान उमेदवारांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागण्याचे चित्र समोर आले असून, शहरातील अनेक प्रभागांमध्ये मतदार आता केवळ आश्वासनांवर समाधानी नसल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत कामगिरीच्या आधारेच उमेदवारांची परीक्षा होणार असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.




















