जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२६
यावल–रावेर रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीजजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (वय २५, रा. महाराणा प्रताप नगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी (दि. ७) पहाटे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या पल्सर दुचाकीने (एमएच १९ डिक्यू ३७०६) रावेरकडून यावलकडे जात होता. यावल शिवारातील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने हयगयीने व भरधाव वेगाने वाहन चालवत अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी रामदास भगवान कोळी (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर अकिलेशवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
मृत अकिलेशच्या पश्चात केवळ आई असून, तरुण मुलाच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी पुढील तपास करत आहेत. अद्याप अज्ञात वाहन चालकाचा शोध लागलेला नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.




















