जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२६
शेतात पाणी भरण्यासाठी दुचाकीने निघालेल्या तरुण शेतकऱ्याला भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील नेवरा मारोती मंदिराजवळ घडली. अपघातानंतर चालक वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून वाहन पकडले; मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील जगदीश अशोक पाटील (वय ३७) हे शेती व्यवसाय करत होते. शनिवारी रात्री ते पाचोरा रस्त्यावरील शेतात पाणी भरण्यासाठी (एमएच १९, ईयू ११६५) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. शिरसोलीकडून वावडद्याकडे जात असताना नेवरा मारुती मंदिराजवळ पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा मालवाहू वाहनाने (एमएच २०, ईजी ६५२९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, जगदीश पाटील रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मालवाहू वाहन चालकाने वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून नायरा पेट्रोल पंपाजवळ वाहन अडवले. चालकाने वाहन जागीच सोडून पसार होण्यात यश मिळवले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत जगदीश पाटील यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी अनिल वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.




















