जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६
चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमाला चारचाकी वाहनाने जाताना वाहनाला अपघात झाला. या वाहनात असलेल्या राहुल भोई व मयूर राजपूत या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना १६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडा गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विरवाडा येथील राहुल अमृत भोई (वय ३१) व मयूर अरुण राजपूत (वय १९) हे या अपघातात ठार झाले आहेत. तसेच विजय अमृत भोई (वय ३५), बंटी रवींद्र कोळी (वय १९) व राकेश भगवान राजपूत (वय ३५) हे जखमी झाले आहेत. हे पाचही जण इर्टीगा या चारचाकी वाहना (एमएच- १९, बीएस- १००८) ने चोपडा येथे होत असल्या धार्मिक कार्यक्रमासाठी विरवाड्याहून चोपड्याकडे १६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास निघाले होते. चोपड्याकडे येत असताना आडगाव व चोपडादरम्यान चालक मयूर भोई याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या अपघातात राहुल अमृत भोई व मयूर अरुण राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय अमृत भोई हा गंभीर जखमी झाल्याने त्याला चोपड्याहून जळगाव येथे हलवण्यात आले. तर जखमी बंटी रवींद्र कोळी व राकेश भगवान राजपूत यांच्यावर चोपड्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातची माहिती मिळताच विरवाडे येथील सरपंच विशाल म्हाळके, माजी पं.स. सभापती आत्माराम म्हाळके व ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. तर, ही माहिती मिळताच पो. नि. मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयत मयूर राजपूत यांच्यावर दुपारी ३ वाजता तर राहुल भोई यांच्यावर दुपारी ४.३० वाजता विरवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा समावेश असून त्यातील राहुल अमृत भोई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर विजय अमृत भोई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडा येथील भोई परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मयत राहुल अमृत भोई, मयूर अरुण राजपूत तसेच जखमी विजय अमृत भोई, बंटी रवींद्र कोळी, राकेश भगवान राजपूत हे पाचही जण प्रवासी रिक्षा चालवून आपला उदारनिर्वाह करत असल्याचे सांगण्यात आले. यात चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमात त्यांची वाहने भाड्याने दिली होती. अपघातच्या आदल्या दिवशी घरी जाताना त्यांनी आपली वाहने चोपड्यातच ठेऊन एटिंगा गाडी घेऊन ते विरवाडे येथे गेले होते. तर सकाळी पुन्हा चोपडा येथे याच गाडीने परत येत असतांना हा अपघात झाला आणि त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.




















