जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२६
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका चार वर्षीय चिमुकल्याला रात्रभर वर्गखोलीत कुलूपबंद अवस्थेत राहावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरकर लेआऊट परिसरातील अंगणवाडीत ही घटना घडली. संबंधित मुलगा बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेला होता. खेळता खेळता तो बाजूच्या खोलीत गेला आणि तिथेच झोपी गेला. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व खोल्यांची तपासणी न करता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले आणि घरी निघून गेले.
दरम्यान, मुलगा घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. स्थानिकांनी अपहरणाची भीती व्यक्त केल्याने पालकांनी तातडीने खापरखेडा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. संदीप पखाले यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करून रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच आसपासचे तलाव व नालेही पिंजून काढण्यात आले. तरीही मुलाचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पालकांची चिंता वाढत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस उपायुक्तांनी स्वतः घटनास्थळी जाऊन अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार अंगणवाडीचे कुलूप उघडण्यात आले असता, मुलगा वर्गातच भीतीने थरथरत बसलेला आढळला. आईला पाहताच त्याने मिठी मारून हंबरडा फोडल्याचे हृदयद्रावक चित्र उपस्थितांनी पाहिले. घटनेनंतर पोलिसांनी अंगणवाडी प्रशासनाला कडक शब्दांत ताकीद दिली. शाळा बंद करण्यापूर्वी प्रत्येक खोलीची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भविष्यात अशा प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकवर्गातून संताप व चिंता व्यक्त केली जात आहे.





















