
आव्हाणे येथील संजय पाटील यांचा अंत; जीवघेण्या डोहांमुळे संतापाची लाट
जळगाव मिरर | ५ मार्च २०२६
तालुक्यातील आव्हाणे येथील संजय मणिलाल पाटील (वय ४५) या कष्टकरी तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ मार्च रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास घडली. अनधिकृत वाळू उपशामुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या खोल आणि जीवघेण्या डोहांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील रहिवासी संजय पाटील हे एका मिस्तरीकडे मजुरीचे काम करत होते. मंगळवारी ते धरणगाव तालुक्यातील एका गावात कामासाठी गेले होते. काम आटोपून ते दुपारी पायी आपल्या आव्हाणे गावाकडे परतत होते. दरम्यान, दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास ते गिरणा नदीपात्रातून जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडले. नदीपात्रात तयार झालेल्या खोल डोहामुळे ते पाण्यात बुडाले. नदीकाठी उपस्थित असलेल्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत संजय पाटील यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
संजय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दहा वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशामुळे अशा जीवघेण्या डोहांची निर्मिती होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.




















