
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
राज्यातील विधान भवनाला बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दलांची चांगलीच पळापळ झाली होती. विधान भवन परिसरातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कसून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र काही वेळानं ही अफवाच असल्याचं स्पष्ट झालं अन् विधान भवनाचं कामकाज पूर्ववत झालं.
रोहिणी खडसेंचे ट्विट
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी वेगळीच शंका बोलून दाखवली आहे. त्यांनी ट्विट केलं की, ‘महाराष्ट्र विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी आली असल्याची बातमी वाचली. हा विषय फार गांभीर्याने घेतला पाहिजे. खरंच असा ई-मेल आला आहे की राज्यात जो गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे याचा तपास झाला पाहिजे.’
रोहिणी खडसे या आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, ‘असा ई-मेल जर खरंच आला असेल तर विधानभवन म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र स्थान आहे. जर तेच ठिकाण उडवण्याची धमकी मिळत असेल तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’
दरम्यन, विधान भवनासह मेट्रो स्टेशन, उच्च न्यायालय आणि अन्य महत्वाची ठिकाणे बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी ई-मेल द्वारे देण्यात आली होती. यानंतर पोलीस दल बॉम्ब शोधक पथकासह आणि श्वान पथकासह विधान भवनात दाखल झालं होतं.
यानंतर विधान भवनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं अन् शोध मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे विधान भवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं राज्यातील सर्व विधान सभा आणि विधान परिषदेचे आमदार, आएएस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या परिसरात असतात. त्यामुळं आलेल्या या धमकीचं गांभिर्य खूप मोठं होतं.
पोलीस दलाने तपास पूर्ण केल्यानंतर कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू सापडलेली नाही असा निर्वाळा देत आलेला ई-मेल हा धमकीचा फेक कॉल होता असं सांगितलं.




















