
जळगाव मिरर | २ मे २०२६
राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला गाईचं वासरू दाखवतो, असे सांगून तिचा हात धरून जवळच्या गोठ्यात नेले. त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. कुटुंबीयांना याची काहीच कल्पना नव्हती. दुपारनंतर मुलगी अचानक दिसेनाशी झाल्यानंतर तिचा शोध सुरू झाला. याचदरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपीने अत्याचारानंतर चिमुरडीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यातच लपवण्याचा प्रयत्न केला. शोध घेत असताना कुटुंबीयांना ती जनावरांच्या गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण गाव हादरून गेले. संबंधित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती, ही बाब अधिक वेदनादायी ठरली.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर दबाव आणत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. काही नागरिकांनी तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच शिक्षा करू, अशी आक्रमक भूमिका घेतली. गावातील महिलांनीही या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करत रास्ता रोको केला. मृत चिमुरडीचा मृतदेहही पोलिस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत काढली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले, मात्र संताप कायम आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत असून, पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






















