
जळगाव मिरर | ६ मे २०२६
पती-पत्नीच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या हव्यासापोटी एका पत्नीने आपल्या शिक्षक पतीची सुपारी देऊन निर्घृण हत्या घडवून आणल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी रवींद्र कुलमेथे (वय ४६) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. २ मे रोजी भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीतील घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाच्या गळ्याभोवती प्लास्टिकची पिशवी आणि दुपट्टा गुंडाळलेला असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान मृताची पत्नी दीपमाला कुलमेथे हिच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने संपूर्ण कटाची कबुली दिली.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दीपमाला ही पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळली होती. नागपूर येथे उपचारासाठी गेली असताना तिची ओळख वर्षा परचाके नावाच्या महिलेशी झाली. वर्षानेच तिला पतीचा कायमचा काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दीपमालाने वर्षा परचाके, प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांच्या मदतीने तब्बल एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला.
२९ एप्रिल रोजी दीपमालाने पती रवींद्र यांना दिघोरी येथे नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्ताने बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी आरोपी सोनू कालोकर आणि नाझीर अंसारी कार घेऊन तेथे पोहोचले. दीपमालाने स्वतःच पतीला आरोपींच्या ताब्यात दिले. आरोपींनी रवींद्र यांना घोडपेठ परिसरातील निर्जन स्थळी नेऊन कारमध्येच गळा आवळून त्यांची निर्घृण हत्या केली.
पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रवींद्र आणि दीपमाला हे गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत होते. मात्र, पती शिक्षक असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळेल, या स्वार्थी हेतूने दीपमालाने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.
केवळ सरकारी नोकरी आणि पैशांच्या हव्यासापोटी पत्नीने आपल्या पतीचाच जीव घेतल्याने समाजमन सुन्न झाले असून, या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.





















