
जळगाव मिरर | ३ जून २०२६

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आपल्या पुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र भाजपने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी करत मनातील भावना व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळाले नाही. पण मी एवढेच सांगतो, ‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा.’ त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. देवाच्या मनात यापेक्षाही काही चांगले असेल. राजकारण करा, पण भगव्या विचारांपासून दूर जाऊ नका,” असे ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामागे विधान परिषद उमेदवारीबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः जागावाटपाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अनेकदा चर्चा केल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीतील जागावाटपाच्या समीकरणात भाजपने जळगावची जागा स्वतःकडेच राखून ठेवली.
प्रतापराव पाटील यांना विधान परिषद उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा होती. त्यांनी पक्षश्रेष्ठींसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र भाजपच्या भूमिकेमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या नाराजीचा परिणाम आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारावर होऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
नाराजीचे आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना गुलाबराव पाटील यांची अनुपस्थिती. जळगाव जिल्ह्यात उपस्थित असूनही त्यांनी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही लोकप्रतिनिधी देखील या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे दिसून आले. यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मित्रपक्ष भाजपबद्दलची नाराजी लपून राहिलेली नसून ती आता सार्वजनिकरीत्या व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.




















