
जळगाव मिरर | १५ जून २०२६

शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) काही अटींमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहीत पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत मध्यस्थी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली. त्यानंतर २२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने रोहित पवार यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर महाजन यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधत मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. सरकारने २२ जूनपूर्वी बैठक आयोजित करण्याचे मान्य केल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “२२ जूनपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी सरकारसोबत बैठक होणार आहे. ३० जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी अपेक्षित असल्याने त्याआधी आवश्यक बदल करण्यात यावेत, ही आमची भूमिका आहे. चर्चेसाठी शेतकरी नेते, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील.”

ते पुढे म्हणाले की, “मागण्यांमध्ये केवळ दोन महत्त्वाच्या अटी आहेत. सरकारने त्या मान्य कराव्यात. जर त्यात कोणतीही गडबड झाली तर ४ जुलैपासून मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे.”
दरम्यान, गिरीश महाजन यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली असून त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास आहे.” या घडामोडींमुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर आता सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २२ जूनपूर्वी होणाऱ्या बैठकीकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





















