
जळगाव मिरर | १९ जून २०२६

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नवीन कानळदा रोड परिसरात मुख्य रस्त्यालगतच्या गटारी गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांच्या प्रादुर्भावातही वाढ झाली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक आणि कचरा साचला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
या संदर्भात परिसरातील रहिवासी रुपेश महाजन यांनी जळगाव महानगरपालिकेकडे तक्रार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गटारींची साफसफाई करून सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांनी सांगितले की, गटारीतील साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी निर्माण होत असून डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित साफसफाईचे नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





















