
जळगाव मिरर | २० जून २०२६

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ ते १० भाविक गंभीर जखमी झाले असून, ३० ते ४० भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
यशवाडी देवस्थान हे परभणी जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून दर शनिवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शनिवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. मंदिरासमोरील सभागृहात कीर्तन, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभामंडपात उपस्थित असतानाच दुपारच्या सुमारास अचानक सभामंडपाचे पिलर कोसळले. काही क्षणांत संपूर्ण परिसरात धुरळा उडाला आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेबद्दल खासदार संजय जाधव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमी भाविकांना तातडीने उपचार मिळावेत आणि प्रशासनाने सर्वतोपरी मदतकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या संकटाच्या काळात प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सभामंडपाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी भाविक व नागरिकांकडून होत आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




















