
जळगाव मिरर | २० जून २०२६

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी आणि श्री देव गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळे येथे आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील तरुणांच्या गटावर काळाने घाला घातला. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या लाटांचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच तरुण समुद्रात बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शनिवारी घडली. हे पाचही तरुण सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर परिसरातील एकूण १९ जणांचा मित्रपरिवार पर्यटनासाठी कोकणात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून हा गट विविध पर्यटनस्थळांना भेट देत होता. शनिवारी सकाळी त्यांनी गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही तरुण पाण्यात उतरले. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास समुद्रातील वाढत्या लाटा आणि तीव्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही तरुण खोल पाण्याकडे ओढले गेले. काही क्षणांतच पाच जण समुद्राच्या प्रवाहात नजरेआड झाले. सोबतचे मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच इतर पर्यटकांनी मदतीसाठी आक्रोश केला.
समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीप आदमाने (१९) आणि यश दामोदर कांबळे (२०) अशी आहेत. विशेष म्हणजे या पाच तरुणांपैकी तिघे पोलीस भरतीची तयारी करत होते. तर उर्वरित दोघेही आपल्या कुटुंबाचा आधार बनण्यासाठी संघर्ष करत होते. त्यामुळे या घटनेने संपूर्ण बिडकीन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि जीवरक्षकांनी कोणतीही पर्वा न करता समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रयत्नांत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र पाच जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
सध्या कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. लाटांचा जोर आणि मागे खेचणारा प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य अधिक तीव्र करण्यात आले आहे. किनारी भागात विशेष पथके तैनात करण्यात आली असून समुद्रात शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनारा पावसाळ्यात धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरणे टाळावे, तसेच जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. बेपत्ता तरुणांचा शोध लागावा यासाठी संपूर्ण बिडकीन गावासह परिसरातील नागरिक प्रार्थना करत आहेत.





















