
जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी गिरीश रघुनाथ सूर्यवंशी यांच्या बदलीच्या अंमलबजावणीवरून सध्या विभागात विविध चर्चा रंगल्या आहेत. शासनाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार त्यांची उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) उत्तर विभाग, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिकारी अद्यापही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचा दावा होत असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी चर्चा कार्यालय परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.
महाराष्ट्र शासकीय अधिकारी-कर्मचारी बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४(५) अन्वये हा बदली आदेश जारी करण्यात आला होता. शासनाच्या आदेशातील क्रमांक ५ मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी पदभार सोडल्याची व नवीन ठिकाणी पदभार स्वीकारल्याची माहिती तातडीने शासनाला कळविणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, विहित कालावधीत अधिकारी रुजू न झाल्यास त्याबाबत शासनास कळवून आवश्यक शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूदही आदेशात नमूद आहे.
याशिवाय, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३०(सी) नुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याने नियोजित ठिकाणी रुजू न झाल्यास अशा परिस्थितीत रजेचे अर्ज स्वीकारू अथवा मंजूर करू नयेत, अशी तरतूद असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात अहिल्यानगर येथील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, गिरीश सूर्यवंशी यांनी अद्याप पदभार स्वीकारल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा आहे. त्यामुळे बदली आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक चर्चेचा मुद्दा पुढे आला आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार अशी चर्चा सुरू आहे की, गिरीश सूर्यवंशी आणि जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणे हे दोघेही संभाव्य नव्या नियुक्ती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे सध्याच्या बदली आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र, या चर्चेला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. या सर्व घडामोडींमुळे शासनाच्या बदली आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाली का, संबंधित प्रकरणात नियमांचे पालन झाले का आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार का, याकडे आता विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
संकटमोचकांचे खास मानले जाणारे थेट नाशिकला येणार ?
प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याच्या मर्जीतील असतात, तसेच जळगाव सार्वजनिक बांधकाममधील काही मोजके अधिकारी देखील संकटमोचकांचे खास मानले जातात तर दुसरीकडे नाशिक येथे कुंभमेळाव्याची तयारी सुरू असताना आता सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अधिकारी थेट नाशिकला बदली करण्याच्या तयारी असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.




















