जळगाव मिरर | १७ जुलै २०२६
जळगाव-नेरी मार्गावरील उमाळा घाटाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला कारची भीषण धडक बसून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (१६ जुलै) सायंकाळी घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेला “One Mistake… Game Over” हा संदेश या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळी चर्चेचा विषय ठरला.

मृतांमध्ये इस्राईल शेख इरफान (वय २१, रा. अजिंठा) आणि पंकज हरीष बैंडवाल (रा. इंदूर) यांचा समावेश आहे. तर प्रदीप ऊर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिरीश योगेश चव्हाण (वय २१, रा. खेडी), गौरव राजू परदेशी (रा. इंदूर) आणि अनुज रामावत परदेशी (वय २५, रा. खेडी) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.
परदेशी कुटुंबातील हे तरुण बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून अजिंठा परिसरातील त्यांच्या सुरू असलेल्या बांधकाम साईटकडे जाण्यासाठी ते जळगावहून एमएच-१९ ईपी-२०६६ क्रमांकाच्या कारने निघाले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उमाळा घाटाजवळ पोहोचल्यावर रस्त्याच्या एका लेनला लागून जीजे-०४ एएक्स-२२८० क्रमांकाचा नादुरुस्त ट्रक उभा होता.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चालकाला रस्त्यावरील थांबलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने समोर अचानक वाहन दिसताच त्याने कार वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर तब्बल ५० ते ६० फूट रस्त्याबाहेर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रकला तांत्रिक बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. मात्र, ट्रकचालकाने मागील बाजूस कोणतेही रिफ्लेक्टर, चेतावणी फलक किंवा बॅरिकेड्स लावले नव्हते. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणीही होत आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना वाचविण्यासाठी मोठी धडपड केली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून जखमींना रुग्णालयात नेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, एकाही वाहनचालकाने तत्काळ मदत करण्यास पुढाकार घेतला नाही. जवळपास अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मृत व जखमी तरुणांच्या नातेवाइकांनी आणि मित्रांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.




















