जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागअंतर्गत पुरवठा निरीक्षक व वरिष्ठ लिपिकपदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे ३४५ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातून जिल्ह्यातील ९ पुरवठा निरीक्षकांची भरती होणार आहे, तर यापूर्वीच लिपिकपदाच्या ४१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि वरिष्ठ लिपिक (गट-क) लिपिकपदासाठी राज्यात सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगर विभागात भरल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागातील जागांची संख्या आहे. कोकण (४७), पुणे (८२), नाशिक (४९), छत्रपती संभाजीनगर (८८), अमरावती (३५) व नागपूर (२३) या विभागासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पुरवठा निरीक्षकपदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता ग्राह्य धरली जाणार आहे; परंतु ‘अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान’ विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. दरम्यान, वर्षभरापूर्वीच ४१ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. या लेखी परीक्षेनंतर टायपिंगसह मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.