
जळगाव मिरर | ४ मे २०२६
आयुष्याच्या कठीण वळणावर उभ्या असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मुलांसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने ‘आपुलकी’चा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘आपुलकी’ हा उपक्रम या मुलांच्या भविष्यास नवी दिशा देणारा ठरत आहे.
वडिलांच्या निधनानंतर आयुष्य अंधारात गेलेल्या या चिमुकल्यांना आता शिक्षणाची नवी उमेद मिळणार आहे. पुणे येथील ‘स्नेहवन’ ही सामाजिक संस्था या मुलांना मोफत निवासी शिक्षणाची संधी देत असून, आळंदी येथील निवासी शाळेत इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
२०१५ पासून कार्यरत असलेली ‘स्नेहवन’ संस्था केवळ शिक्षणच नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठीही प्रयत्नशील आहे. प्रेम, आधार आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर या मुलांना पुन्हा उभं राहण्याची संधी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भावनिक आवाहन केले आहे. ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी १५ मेपूर्वी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असणे आवश्यक असून प्रवेश इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच दिला जाणार आहे. इच्छुक कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुःखाच्या गर्तेत अडकलेल्या या कुटुंबांसाठी ‘आपुलकी’ हा उपक्रम केवळ योजना नसून आशेचा किरण ठरत आहे. आता या संधीचा लाभ घेऊन अनेक मुलांचे आयुष्य नव्याने उजळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इच्छुक व पात्र कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक 0257-2223180 / 0257-2217193 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.




















