
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ॲड. रोहिणी खडसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात पेट्रोल-डिझेलची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता डिझेलअभावी शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे. पेरणीच्या तोंडावर ट्रॅक्टर, पंप, मशागतीची यंत्रे आणि इतर शेती अवजारे चालवण्यासाठी डिझेल अत्यावश्यक असताना अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी मर्यादित पुरवठा होत असून दररोज दरवाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
जळगाव, बुलढाणा, वर्धा, अकोला, अमरावती, जालना, बीड यांसह अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांना डिझेलसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी ॲड. रोहिणी खडसे यांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
त्यामध्ये राज्यात डिझेल टंचाई ही आपत्ती घोषित करावी, प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयांतर्गत “शेतकरी डिझेल मदत कक्ष” सुरू करावा, डिझेल पुरवठा सुरळीत होईपर्यंत पेट्रोल पंप २४ तास सुरू ठेवावेत, सर्व पेट्रोल पंपांवरील डिझेल साठ्याची माहिती सोशल मीडियावर व महसूल विभागाकडे उपलब्ध करावी, प्रत्येक पेट्रोल पंपावर किमान ३० टक्के डिझेल साठा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावा, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे.





















