जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
राज्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात आज मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा सुरु झाली आहे यावेळी राज्यभरातील मराठा बांधव या सभेसाठी मैदानावर दाखल झाले असून या विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार करत राज्य सरकारवर हल्ला चढवला.
“आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज घराघरातला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार होतो, हे सांगेल, घराघरातील मराठा आरक्षणासाठी पेटून उठला आहे, असे म्हणत सरकारला उरलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा, अशी मागणी केली. तसेच आरक्षणाच्या मागणीवरुन एक इंचही मागे सरणार नाही, असा खणखणीत इशाराही सरकारला दिला.
यावेळी सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचाही समाचार घेतला. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली होती. यावरुन बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांनी असे येडपाट का पाळले आहेत, त्याला योग्य ती समज द्या.. अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंना फटकारले.