जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
पैसे घेवून लग्न लावणाऱ्या टोळीविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने परभणी येथे बनावट लग्न लावल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करुन तो परभणी येथे वर्ग केला जाणार आहे. तसेच बेपत्ता असलेली तरुणी जळगावात येताच रामानंद नगर पोलिसांनी तीला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगावच्या मुलीचे कोल्हापूर येथील तरुणासोबत परस्पर लग्न लावून दिले. लग्नासाठी दिलेले पैसे आणि सोन्याचे दागिने परत मिळविण्यासाठी जात असल्यायन मुलीच्या वडीलांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पैसे घेवून लग्न लावून दिलेल्या टोळीने फसवणुक केली याप्रकरणी आशिष गंगाधरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगी, मध्यस्ती महिला मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर, धनश्री नामक महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना पैसे घेवून लग्न लावणाऱ्या टोळीने तरुणीचे आणखी चार ठिकाणी लग्न लावल्याचे समोर आले आहे. यापैकी परभणी येथे शेवटचे लग्न लावले असून तेथील तरुणाची देखील अशाच पद्धतीने त्यांनी फसवणुक केल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे. त्यानुसार या टोळीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तो परभणी येथे वर्ग केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली तरुणी ही आज सकाळी घरी आली. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सपोनि सचिन रणशेगरे, जितेंद्र राजपूत, प्रवीण जगदाळे, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, योगेश बारी यांचे पथक तयार केले. या पथकाने मुलीला ताब्यात घेतले असून तीची चौकशी केली जात आहे.




















