जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२६
साडूच्या वडीलांचे निधन झाल्याचे सांगत वैजयंती गणपत माळी (वय ८५, रा. करंजी, ता. पारोळा) या वृद्ध महिलेचा तीने मुलगा मानलेल्या बहिणीच्या मुलाने अपहरण करुन खून केला. त्यानंतर मृतदेह महामार्गालगत असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त चारीत विल्हेवाट लावली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून सुमारे चाळीस दिवस सलग या गुन्ह्याचा तपास करीत संशयित प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. धुळे) याच्या मुसक्या आवळून या गुन्ह्याचा उलगडा केला.

आपत्य नसल्याने पतीचे निधन झाल्यानंतर एकट्या राहत असलेल्या वैजयंताबाई माळी दि. ३ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाल्या. वृद्धेच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने असल्याने त्यांचा घातपात संशय बळावल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी चार उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना केली. पहिल्या पथकाने संशयिताचा शोध घेण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी पारोळा, दळवेल, मुकटी, फागणे, धुळे व चाळीसगाव याठिकाणी संशयिताचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकावर बेपत्ता महिलेचा शोध घ्यायचा असल्याने त्यांनी सुमारे अडीचशे किमीचा प्रवास करीत तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला.
पोलिसांनी वैजयंताबाई माळी बेपत्ता झाल्या त्या दिवशीचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये वृद्धेने मुलगा मानलेला भाचा प्रशांत माळी हा अंगणात तिच्यासोबत बोलतांना दिसला. त्यानंतर वृद्ध महिला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून ती कार पारोळ्याच्या दिशेने जातांना दिसल्यानंतर पोलिसांना प्रशांतवर संशय बळावला. तसेच तो देखील गेल्या अनेक दिवसांपासून मिळून येत नसल्याने पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. चाळीस दिवसानंतर पोलिसांनी संशयित प्रशांत माळी याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याला खाक्या दाखविताच त्याने त्याच्यावर असलेल्या कर्जामुळे आई समान असलेल्या मावशीचा तिच्याजवळील दागिन्यांसाठी रुमालाने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. मावशीच्या अंगावरील दागिने त्याने धरणगाव, अमळनेर व धुळे येथे विकले तर काही दागिने फागणे येथे लाविल्याचे पोलिसांना सांगितले असून पोलिस मुद्देमाल जप्त करत आहे
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे संतोष पवार, पोहेकॉ हिरालाल पाटील, विलेश सोनवणे, सलीत तडवी, राहुल बैसाने, विलास गायकवाड, राहुल कोळी, गोपाळ पाटील, मयुर निकम, बाबासाहेब पाटील, महेश सोमवंशी, रिझवान शेख, तांत्रिक विश्लेषण मिलींद जाधव, गौरव पाटील तर पारोळा पो. स्टे.चे निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक अमोल दुफळे, सुनिल हटकर, अनिल राठोड, सतिष पाटील, चेरसिंग मेहेर यांच्या पथकाने केली
शिरसोली येथे नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे सांगत वैजयंताबाई यांना प्रशांत माळीने (एमएच १९, बीजे ००७१) क्रमांकाच्या कारमध्य बसवले. दिवसभर त्यांना धरणगाव, अमळनेर, धुळेया मार्गावर फिरवल्यानंतर मावशीकडे दागिन्यांची मागणी केली. मात्र त्यांनी दागिने देण्यास नकार दिल्याने मध्यरात्री दीड वाजता रागाच्या भरात गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून तो घरी जावून झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने मृतदेहाची विल्टेवाट लावण्याकरीता दिवसभर फिरत होता, मात्र सायंकाळच्या सुमारास त्याने कानळदा फाट्याजवळील सर्व्हिस रोड लगत असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त चारीत फेकून देत विल्हेवाट लावली.
संशयिताने विल्हेवाट लावलेल्या ठिकाणावरील सिमेंटच्या चारीतून पोलिसांनी मानवी सांगाडा मिळून आला. पोलिसांनी तो सांगाडा ताब्यात घेत तो जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, चाळीस दिवसांपासून सुरु असलेल्या घटनेचा उडलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.




















