जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२४
फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या महाराष्ट्रात नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान या विषयी सर्वांगाने कार्य करणाऱ्या संस्थेच्या विद्यमाने ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान खानदेश विभागात प्रबोधन रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या महादान प्रबोधन यात्रेला धुळे येथून प्रारंभ होऊन या यात्रेचा पिंपळनेर, नंदुरबार, तळोदा, शहादा, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर, चोपडा, अमळनेर या विविध ठिकाणांहून मार्गक्रमण होऊन अखेर जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयायात समारोप कार्यक्रम झाला.
राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी यांच्या संयुक्त विध्यमाने संपन्न झालेल्या या जनजागृती कार्यक्रमातील व्यासपिठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, सहसचिव प्रशांत पागनीस, रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गवर्नर आशा वेणुगोपाल, अध्यक्ष प्रकाश पटेल व सचिव मनीष पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई हि संस्था प्रबोधन रथयात्रेचे आयोजन करीत असून हि खरोखर एक कौतुकास्पद बाब आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या प्रबोधन रथयात्रेतून करण्यात आला असून या रथयात्रेत सहभागी होत अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी म्हटले कि, अवयवदान करण्याचा निर्णय हा प्रामुख्याने कुटुंबाच्या निर्णयावर अवंलबून असतो. त्यामुळे एकप्रकारे एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर त्याचे अवयवदान करायचे की नाही, हे त्याचे कुटुंबीय ठरवत असतात. हा निर्णय काही तासांत कुटुंबाला घ्यावा लागत असतो. यामध्ये वैद्यकीय मार्गदर्शन, कुटुंबाची आणि त्यांच्या समाजघटकांची साथ अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या माणसाचा एखादा अवयव दान केला तर त्यामुळे दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान किंवा आशादायी जीवन मिळू शकते, ही भावना असेल तरच अवयवदान होऊ शकते. अनेकदा घरच्यांना त्यांच्या माणसाच्या मृत शरीरातील त्वचा किंवा पेशी तरी दान देण्याची इच्छा असते, परंतु संपूर्ण नातेवाईकांच्या सहमतीने याबाबत निर्णय घेणे, अद्यापही सहजशक्य नाही. यासाठी व्यापक जनमत तयार व्हायला हवे, असे फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. तसेच रोटरीचे स्वयंसेवक नटराजन अय्यर यांनी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ अशी मानसिकता तयार होणारा समाज निर्माण करण्यासाठी माणुसकीच्या जाणिवा आणि गैरसमजांच्या भ्रमातून बाहेर येणे आवश्यक आहे. व्यापक जनजागृती आणि अवयवदान हे जीवनदान हा संदेश राष्ट्र पातळीवर जनमानसांत रुजणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात विध्यार्थी व कर्मचाऱ्यानी अवयवदान जनजागृतीसाठी प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले तर आभार प्रा. वसिम पटेल यांनी मानले तसेच यावेळी प्रा. रफिक शेख व प्रा. मानसी दुसे हे उपस्थित होते.