
जळगाव मिरर | ११ मे २०२६
जळगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू केलेल्या विशेष शोध मोहिमेत मोठी कारवाई करत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच तिला आश्रय देणाऱ्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जळगाव शहर व जिल्ह्यात अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जोशी पेठ परिसरातील भोई गल्ली येथे एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राहत आहे. या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी दि. १० मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही महिला पोलिसांना आढळून आली. तपासात तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिने अवैध मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून जळगावात अनधिकृतपणे वास्तव्य केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेसह चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही त्याने तिला पोलिसांपासून लपवून ठेवत आश्रय दिल्याचा आरोप आहे.
सदर प्रकरणी इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ च्या कलम २१, ०८ आणि २४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत. दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध वास्तव्य किंवा बनावट कागदपत्रांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





















