जळगाव मिरर / २२ मार्च २०२३
हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगेविषयी मोठं वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आज शिवसेना, धनुष्यबाण आणि सत्ता आहे. मी गेल्या सभेत सांगितले होते की, मशिदीवरील भोंगे बंद करा, त्याचे काय? पहिले म्हणजे माझ्या सतरा हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले ते रद्द करा. दुसरा निर्णय म्हणजे मशिदीवरील भोंगे बंद करा अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. दोन पैकी एक निर्णय मान्य करावाच लागेल. मी विषय सोडला नाही, सोडणारही नाही. सांगलीतील विषयाकडे लक्ष द्या.
राज ठाकरे म्हणाले, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की, मी एकदिवस उद्धव ठाकरेंकडे गेलो आणि गाडीत बसून त्याला चल असे म्हटले. बोल तुला काय हवंय. तुला पक्षाचे अध्यक्ष प्रमुख व्हायचेय. उत्तर होते हो.. उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचे का तर सर्व उत्तर होय होते. मी म्हटले माझे काम काय? मला प्रचाराला बाहेर काढू नका. तो म्हटला मला काही प्राॅब्लेम नाही. मी म्हटलो नक्की ना…ठरलं मग. मी घरी गेलो आणि बाळासाहेबांना सांगितले की, सर्व प्राॅब्लम मिटला. त्यांनी मला मिठी मारली उद्धवला बोलवं असे म्हटले. पाच मिनिटे बाळासाहेब अधीर झाले होते. नंतर काय झाले सर्वांनाच माहित आहे.
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना हेच सांगतो की, मुख्यमंत्री म्हणून काम करा. उद्धव ठाकरे जिथे सभा घेत आहेत, तिथे सभा घेऊ नका. महाराष्ट्रात प्रश्न प्रलंबित आहे. पेन्शन असो की, अन्य प्रश्न विषय संपवावा. मुंबईत पोल लावले ती मुंबई आहे का डान्सबार हेच समजत नाही. सुशोभीकरण असे असते का? लायटींग लावायची ही पद्धत आहे का? राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात काय राजकारण चाललेय. सरकार कोर्टाकडे बघतेय. आमचे काय होणार. हे सरकार कोर्टावर अवलंबुन आहे. सर्वांनी एकदा ठरवा आणि आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा. तो काय चिखल केला ना, तो निस्तरा.